*आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक*
आपण जेव्हा भारताच्या इतिहासाची पाने उलटतो तेव्हा इतिहासाच्या अंधार्या गुहेतुन उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या शौर्याची प्रखर किरणे दिसतात.
देशावर इंग्रजांची जुलमी राजवट होती साधनसंपत्तीची लूट ,जबरदस्तीने धर्मांतर यामुळे त्रस्त झालेल्या रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सगळ्याच जाती-जमातींनी संघर्ष केला. या सर्वांमध्ये ब्रिटिश काळात क्रांतीची मशाल पेटवली ते आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांनी !
उमाजींचा जन्म पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी दि. ७ सप्टेंबर १७९९ रोजी रोजी झाला. दादोजी खोमणे आणि लक्ष्मीबाई हे त्यांचे आई-वडील होते.
जेजुरीचे मल्हारी मार्तंड खंडोबा हे उमाजी नाईक यांचे आराध्य दैवत होते . याच ठिकाणावरून त्यांनी इंग्रजांविरुद्ध क्रांतीचा वणवा पेटवला.
१८२१ साली झालेल्या रामोशी समाजाचा इंग्रजांविरुद्ध पहिला उठाव होता. या लढ्याचे नेतृत्व उमाजीनी केले. देशव्यापी क्रांतीचे स्वप्न पाहणारा इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतीकारक म्हणजेच उमाजी नाईक.
महाराष्ट्रातील रामोशी समाजाची वस्ती ही डोंगरकपारीत असायची, त्यावेळी पुणे, सातारा जिल्ह्यात त्यांची सतरा- अठरा हजार लोकसंख्या असावी. पण या परिसराच्या संसर्गाने लोखंडाचे सुवर्ण बनावे अशी अवस्था या रामोशी समाजाची झालेली पाहायला मिळते. रामोशी समाजाला श्री शिवछत्रपतींचा सहवास मिळाला आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेत त्यांचा मोलाचा सहभाग होता. शिवकाळात रामोशी समाज हा गावच्या संरक्षणाचे काम करत असे. या समाजाच्या अनेक पिढ्यांनी स्वराज्याचे पाईक म्हणून म्हणून काम पाहिले स्वाभाविकच त्यांच्या अंतकरणात स्वातंत्र्याची चेतना धगधगत होती.
२४ फेब्रुवारी १८२४ आली इंग्रजाच्या कंपनी सरकारला भांबुर्डा येथील कडेकोट बंदोबस्तात असणाऱ्या खजिना उमाजीनी आपल्या सशस्त्र साथीदारांच्या मदतीने लुटला यामध्ये भरपुर ऐवज मिळाला. उमाजींनी इंग्रजाच्या छावण्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली त्यांचे खजिना लुटण्याचे सत्र सुरूच राहील्याने इंग्रज त्रस्त झाले.
पूर्वी १८१८ मध्ये उमाजी नाईकांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. या काळात ते लिहायला वाचायला शिकले आणि सुटकेनंतर त्यांनी इंग्रजविरुध्द संघर्ष तीव्र केला उमाजींनी रयतेच्या साथीने इंग्रजाविरुध्द संघर्ष केला. इंग्रजांनी सासवड-पुरंदरच्या मामलेदारास उमाजी नाईकांना पकडण्याचे आदेश काढायला सांगितले.
उमाजी नाईक यांनी पश्चिम महाराष्ट्र कोकण भागात स्वतःचे राज्य घोषित केले. इंग्रजांना पळवून लावण्याचा निर्धार त्यांनी केला. सर्व जाती-जमातीतील लोकांना एकत्र करून व गनिमीकाव्याने धुमाकूळ घालून उमाजींनी इंग्रजांपुढे मोठे आव्हान निर्माण केले.
पुण्याचा कलेक्टर रॉबर्टसन रामोशाच्या या उठावाबद्दल सर्व जनता कोणत्यातरी राजकीय बदलाची वाट पाहत असल्याचे लिहिले होते.
आपल्या निशाणाला आणि स्वतःला लोकांनी मान द्यावा असे उमाजींना वाटे ही लक्षणे काही केवळ पोटभरु लुटारू रामोशाची नव्हती उमाजीला पकडण्यासाठी कॅप्टन लिहितो मोठमोठ्या लोकांनी मला स्वतः खात्रीपूर्वक सांगितलेलं की हा उमाजी रामोशी काही असला तसला भटका नव्हे त्यांच्या दृष्टीपुढे नेहमी छत्रपति शिवाजीमहाराजाचे उदाहरण होते. छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे आपण मोठे राज्य करावे.
शेवटी उमाजी नाईकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवत त्यांना फाशीची शिक्षा
ठोठावण्यात आली. दि. 3 फेब्रुवारी 1832 रोजी वयाच्या केवळ
एकेचाळीसाव्या वर्षी भारतमातेसाठी उमाजी हसत-हसत फासावर
गेले. इतरांना दहशत बसावी या हेतूने तीन दिवस त्यांचे प्रेत
पिंपळाच्या झाडाला टांगून ठेवले होते. खुशाबा नाईक आणी बापुजी
सोळकर या उमाजींच्या सहकारींना पण फाशी दिली गेली.
उमाजी फितूरीने पकडले गेले. नसते तर काय झाले असते? इंग्रज अधिकारी मॅकीन्टोश लिहीतो "उमाजीपुढे छत्रपती शिवाजीचा आदर्श होता, त्याला वेळीच फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजीच झाला असता"
भारतमातेसाठी बलिदान करणार्या उमाजी नाईकांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा